SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 रावेर तालुका | प्रतिनिधी :- शकील शेख
मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ओले झालेले वीजखांब, करंटचा सततचा धोका आणि जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटणारे महावितरणचे वीज कर्मचारी हे खऱ्या अर्थाने समाजाचे ‘अनामिक हिरो’ ठरत आहेत. सामान्य नागरिक पावसापासून बचावासाठी घरात सुरक्षित असताना हे कर्मचारी मात्र अंधार, वादळ आणि मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असतात.

⚡ पावसाळ्यात प्रत्येक क्षण जीवघेणा
पावसाळ्याच्या दिवसांत वीज विभागातील लाइनमन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांपुढे अनेक गंभीर धोके उभे राहतात. ओल्या खांबांवर चढून दुरुस्ती करणे, पाण्यात उभे राहून विद्युत वाहिन्यांवरील बिघाड दूर करणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करणे यावेळी छोट्याशा चुकीमुळेही जीव गमावण्याची वेळ येऊ शकते.

⚠️ वीज कर्मचाऱ्यांसमोरील प्रमुख धोके
🔹 पाणी आणि वीजचा जीवघेणा संगम – पावसामुळे वीजखांब, तारा आणि ट्रान्सफॉर्मर ओले झाल्याने करंट लागण्याचा धोका अनेकपटीने वाढतो.
🔹 आकाशीय विजेचा धोका – उंच खांब किंवा ट्रान्सफॉर्मरवर काम करताना वीज कोसळण्याचा कायम धोका असतो.
🔹 घसरून पडण्याचा धोका – पावसामुळे खांब निसरडे होतात. त्यामुळे उंचावरून पडून गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते.
🔹 बॅक करंटचा धोका – शटडाऊन घेतल्यानंतरही काही ठिकाणी इन्व्हर्टर किंवा जनरेटरमधून बॅक करंट आल्यास बंद लाईनमध्ये अचानक वीज प्रवाहित होऊन अपघात घडू शकतो.
🌧️ मुसळधार पावसातही काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत
अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे करजोद, वाघोड, अहिरवाडी आणि मोहगम परिसरात वीजखांबांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक परिश्रम घेत काही तासांतच परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.
👷 अभियंता मुकेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची धडपड
वीज अभियंता मुकेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय खैरे, गौरव पाटील, उत्तम गोसावी आणि दिनेश धनगर हे कर्मचारी करजोद, वाघोड, अहिरवाडी आणि मोहगम परिसरात दिवस-रात्र सेवा बजावत आहेत.
संवाददात्याशी बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पावसात वीजवाहिन्यांमधील बिघाड शोधणे हे मोठे आव्हान असते. अनेकदा अंधारात आणि मुसळधार पावसात प्रत्येक वीजखांबाची तपासणी करत दोष शोधावा लागतो. त्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत करता येतो.
🙏 समाजाच्या सेवेसाठी जीवाची बाजी
महावितरणचे कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी प्रत्येक संकटाला सामोरे जात आहेत. त्यांचे हे कार्य केवळ नोकरी नसून समाजसेवेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
