SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 🟢 अमळनेर | प्रतिनिधी ( मुन्ना शेख )
अमळनेर तालुक्यात वाढत्या प्रचंड उष्णतेमुळे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत असून, गेल्या दोन दिवसांत चार जणांचा संशयित उष्माघात व हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
☀️ शेतातून आल्यावर अचानक झटका; शेतकऱ्याचा मृत्यू
तालुक्यातील एकतास येथील विश्वास नारायण पाटील (वय ४४) हे दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करून घरी परतले होते. घरी आल्यानंतर त्यांनी पाणी पिऊन कुलरसमोर बसताच अचानक त्यांना झटका आला व उलट्या सुरू झाल्या.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश शिंदे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. उष्णतेमुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
🚉 रेल्वेने मेहंदी कार्यक्रमाला येणाऱ्या महिलेचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील निमगूळ (ता. शिंदखेडा) येथील सिंधुबाई रमेश बागुल (वय ६९) या आपल्या भाच्याच्या मुलाच्या मेहंदी कार्यक्रमासाठी रेल्वेने अमळनेर येथे येत होत्या.
सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्या धापा टाकत असल्याचे पाहून एलआयसी अधिकारी आर. बी. पाटील यांनी तत्काळ मदत करत त्यांना रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉ. आशिष पाटील यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
महिलेला प्रचंड ताप असल्याने उष्णतेमुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
⚫ देवगाव देवळीत तरुणाची आत्महत्या
तालुक्यातील देवगाव देवळी येथील अनिल मंगल शिरसाठ (वय ३५) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.
🌡️ उष्णतेने आणखी दोन जणांचे बळी?
दरम्यान, अमळनेर येथील एलआयसी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश जगन्नाथ चौधरी हे लग्न समारंभासाठी उन्हात गेल्यानंतर आजारी पडले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
तसेच ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचाही उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
⚠️ “कडक उन्हात काळजी घ्या”; आरोग्य विभागाचा इशारा
अमळनेर तालुक्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून, दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचाव करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
🔥 वाढत्या उष्णतेमुळे होणारे मृत्यू चिंतेचा विषय बनले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
