Dainik Letest News भुसावळ | हबीब चव्हाण : देशाच्या गौरवाचे प्रतीक असलेला राष्ट्रीय पक्षी मोर मध्य रेल्वे भुसावळ विभागातील विद्युत इंजिन कारखाना (ELW POH) परिसरातील पिट लाईन क्रमांक 2/3 जवळ मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेत मोराचे शरीर भटक्या कुत्र्यांनी फाडून टाकले, आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे या घटनेला सहा दिवस उलटून गेले तरी रेल्वे प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती वनविभागाला दिली नाही, की कारवाई केली नाही हे स्पष्ट झाले आहे.
घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह : विश्वसनीय माहितीप्रमाणे, रेल्वे प्रशासनाने या घटनेची माहिती वन विभागाला दिल्याचे कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या मनोवृत्तीत अडकले असल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांनी मृत मोराचे शरीर फाडले होते.

कायद्याची पायमल्ली आणि कोणतीही जबाबदारी नाही?
भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 नुसार मोर हा अनुसूचित पक्ष्यांमध्ये समाविष्ट आहे. कलम 9: संरक्षित प्राण्याच्या मृत्यूची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर कलम 48-A: राज्य शासनावर संरक्षणाची जबाबदारी कलम 51-A(g): नागरिकांचे कर्तव्य पर्यावरण व वन्यजीवांचे रक्षण. मात्र या प्रकरणात प्रशासन आणि वन विभाग दोघांच्याही जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या क्षेत्रात मागील काही वर्षांत मोर, वानर, लांडोर यांसारख्या संरक्षित प्राण्यांचे मृत्यू घडत असतानाही भुसावळ वनपरिक्षेत्रात वन्यजीव जनजागृतीबाबत एकही ठोस उपक्रम राबवलेला नाही, हे निदर्शनास येते.
नागरिकांचा सवाल रक्षकच भक्षक बनलेत का?
या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने वन विभागाला वेळेवर माहिती दिली नाही, आणि वन विभागानेही कोणतीही तत्काळ कारवाई किंवा उपस्थिती दर्शवलेली नाही. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “जर कायद्याचे पालन सर्वांनाच करावे लागते, तर प्रशासन त्यापासून वगळले जात का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची गरजराष्ट्रीय पक्ष्याच्या मृत्यूवर रेल्वे प्रशासनाचे मौन आणि वनविभागाची निष्क्रियता ही गंभीर बाब असून, या संदर्भात स्वतंत्र चौकशी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई, आणि जनतेपुढे खुला अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा, रक्षणाची जबाबदारी असलेल्या संस्थाच जर दुर्लक्ष करत असतील, तर संविधानिक चौकटच बळकट राहणार नाही. “कायद्याचे पालन सर्वांनाच करावे लागते प्रशासनालाही. जर रक्षकच भक्षक बनत असतील, तर संविधानाचा अर्थ शून्य होतो.

“वनप्रेमींची प्रतिक्रिया : “अज्ञान, भीती आणि जनजागृतीचा अभाव घातक” “हा प्रकार दुर्दैवी आहे. शॉक लागून मोराचा मृत्यू झाला असण्याची शक्यता असून, अज्ञान आणि कायद्याच्या भीतीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली नाही. अशा प्रसंगी नागरिकांनी तत्काळ 1926 टोल-फ्री क्रमांकावर किंवा वन्यजीव प्रेमींशी संपर्क साधावा. तसेच वन विभागाने जनजागृतीसाठी श्रेणी 1 व 2 प्राणी/पक्ष्यांबाबत समाजमाध्यमांतून मोहीम राबवली पाहिजे.” त्यांनी कारखान्यांत व कार्यालय परिसरात प्राणी/पक्ष्यांना आकृष्ट करणारे अन्नपदार्थ खुले न ठेवण्याचे आवाहनही केले. सतीश कांबळे वन्यजीव प्रेमी भुसावळ
वनविभागाची अधिकृत प्रतिक्रिया आणि निष्क्रियता : या प्रकरणात dainik Letest Newsशी बोलताना सांगितले : “मध्य रेल्वे भुसावळ विद्युत इंजिन कारखान्याकडून कोणतीही तक्रार किंवा माहिती आम्हाला 19 मे तारखेला प्राप्त झालेली नाही. तसेच घटनेची अधिकृत नोंदणीही आमच्याकडे नाही. परिमल साळुंखेअतिरिक्त कार्यभार अधिकारी वनपरिक्षेत्र मुक्ताईनगर